राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत आता राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना करोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कदम घरीच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत.

थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी करोना चाचणी केली होती. शुक्रवारी दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांना त्यांनी चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास असल्याचंही ते म्हणाले आहेत.

विश्वजित कदम काय म्हणाले –
धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी, ही विनंती. माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोनद्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन. माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या योजना, कोरोना रोखण्यास उपाययोजना, मंत्रालय बैठका, भंडारा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज… संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास!

राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली.