राज्याच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी राजस्थानच्या कोटा येथून निघालेली रेल्वेची ‘पाणी एक्सप्रेस’ उद्या लातूरकरांची तहान भागवणार आहे. पाणी एक्स्प्रेस पाच लाख लिटर पाणी घेऊन उद्या संध्याकाळी लातूरला पोहचेल. या गाडीला प्रत्येकी ५४ हजार लीटर क्षमतेच्या ४९ वाघिण्या असून, मिरज रेल्वे स्थानकात त्यात पाणी भरून ते लातूरला पोहोचविले जाणार आहे. वारणा धरण ते मिरज रेल्वे स्टेशन या दरम्यानची पाईपलाईन अद्याप तयार झाली नसल्याने रेल्वेने दुसऱ्या मार्गाची चाचपणी सुरु केली आहे. रेल्वे जंक्शनमध्ये ज्या पाईपलाईनद्वारे पाणी येतं, तिथूनच पाणी नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रयत्न पूर्णत्वास नेऊन आजच लातूरसाठी रेल्वे रवाना करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. लातूर जिल्हय़ामध्ये यंदा दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही येथील नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. या भागातील नागरिकांना रेल्वेने पाणी पोहोचविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत रेल्वेशी चर्चा करून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री राजस्थानमधील कोटा येथून ही पाणी एक्सप्रेस रवाना करण्यात आली होती.