२०१४ च्या तुलनेत दुप्पट वाढ नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रतिज्ञापत्रात त्यांनी कुटुंबाकडे १० कोटी १५ लाख ७२ हजार ३७६ रुपये इतकी स्थावर व जंगम मालमत्ता दाखविली आहे. २०१४च्या ४ कोटी ६७ लाख ३६ हजार ३३६ रुपये या उत्पन्नाच्या तुलनेत २०१९ मध्ये ५ कोटी ४८ लाख ३६ हजार रुपयांनी मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७ हजार ५०० रुपये रोख असून बँकेत ८ लाख २९ हजार ६६५ रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे १२ हजार ५०० रुपये रोख असून ३ लाख ३७ हजार २५ रुपयांच्या बँकेत ठेवी आहेत. मुख्यमंत्र्यांकडे १४ लाख ३१९ रुपयांचा विमा असून अमृता यांच्याकडे ५ लाख ९२ हजार ६०२ रुपयांचा विमा आहे. मुलगी दिवीजाकडे ८ लाखांचा विमा आहे. मुख्यमंत्र्यांकडे महिंद्रा एक्सयूव्ही-५०० ही कार व व एक दुचाकी, एक किलो ३५० ग्राम सोन्याचे दागिने आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धरमपेठच्या त्रिकोणी पार्क येथील घराचे विकासकाम सुरू असून त्यावर १ कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. पत्नी अमृता यांच्या नावाने ९९ लाख ३९ हजारांची अचल संपत्ती आहे. कंपन्यांमध्ये अमृता यांची १ कोटी ३५ लाख ३९ हजार ७८४ रुपयांची गुंतवणूक असून त्यांच्यावर ६२ लाखांचे कर्जही आहे. न्यायालयांमध्ये ४ प्रकरणे प्रलंबित मुख्यमंत्र्यांविरुद्ध विविध न्यायालयांमध्ये चार प्रकरणे प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने सतीश उकेंनी दाखल केलेली तीन प्रकरणे आणि मोहनीस जबलपुरे यांनी दाखल केलेल्या एका प्रकरणाचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी परत पाठवलेल्या एका प्रकरणाचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल नागपूर : नागपुरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, सरोज पांडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित होते. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही सर्व मंडळी मिरवणुकीने तहसील कार्यालयात पोहोचली आणि मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार-मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने राज्यात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली. पुढच्या पाच वर्षांत पुन्हा दीन दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक अशा प्रत्येकासाठी पारदर्शीपणे काम करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तुमचे सर्वाचे आशीर्वाद घेऊन मी मुंबईला जात आहे. विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पुन्हा तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येईन, असे मुख्यमंत्री म्हणाले.