देशात केवळ हिंदुत्ववादाचा विचार चालवणे हे देशासाठी घातक आहे. सर्व धर्मियांचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. राधानगरी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मुदाळ येथे शुक्रवारी सायंकाळी प्रचारसभा झाली. आज सकाळी ते पुढील प्रचारासाठी रवाना झाले, तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी , स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात कुरबुरी वाढल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राज्य अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी काल पवार यांची भेट घेऊन कुरघोड्या थांबवाव्यात अशी मागणी केली होती. हा संदर्भ घेऊन पवार यांनी ‘आपल्यातील सर्व नाराजी बाजूला ठेऊन कामाला लागा, असा आदेश जिल्ह्यातील उभय काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठ्या होतात याचा धक्का बसतो, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. कोल्हापुरातील विचारांशी ते सुसंगत नाही, त्यामध्ये आता बदल करायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाआघाडी मधील प्रत्येक उमेदवार आपला समजा. त्याचा प्रचार करा. येथे पुरोगामी विचारांशी तडजोड होत नाही हे दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

आणखी वाचा- जितेंद्र आव्हाडांच्या ‘बेसिकमध्येच लोच्या’ म्हणत भाजपाच्या रम्याने उडवली खिल्ली

प्रमुखांशी चर्चा
कोल्हापूर जिल्ह्यातील महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज सकाळी लवकर शरद पवार यांची भेट घेतली. स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी.एन. पाटील आदींनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. निवडणुकीतील यशाबाबत पवार यांनी त्यांच्याशी कानगोष्टी केल्या.