शेतकऱ्यांनो भाजपाचे नेते तुमच्या दारात मतं मागायला येतील. त्यांना तुमच्या दारातही उभं करु नका असं म्हणत अहमदनगर येथील सभेत शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी शरद पवार हे महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये प्रचार करत आहेत. त्याच अनुषंगाने शरद पवार हे अहमदनगरमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर शरसंधान केलं. भाजपाला शेतकरी आणि शेती यांच्याबाबत काहीही आस्था नाही त्यामुळे त्यांना दारात उभंही करु नका. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारं हे सरकार आहे त्यांना मतं देऊ नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं. या सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले. सरकारच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले. लोकांचे रोजगार गेले असं म्हणत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांवरही टीका केली. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही आमचीही त्यांच्यापासून सुटका झाली असा टोला शरद पवार यांनी लगावला.