नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून शहापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या कामात गर्डर आणि क्रेन कोसळून झालेल्या अपघातात आत्तापर्यंत १७ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुमारे १०० फूट उंचीवरून गर्डर आणि क्रेन कोसळले.
शहापूरच्या सरलांबे गावाजवळ घडली घटना
शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ खुटाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. तब्बल १०० फूट उंच व सव्वा दोन किमी लांबीच्या पुलाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असताना गर्डर लाँचर करताना तांत्रिक कारणामुळे अचानक कोसळला व १७ कामगारांचा यामध्ये मृत्यू झाला. हे सर्व कामगार उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू असे परप्रांतीय असल्याने याठिकाणी मोठा गजहब झाला नाही.
एनडीआरफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरु
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणाहून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मध्यरात्री मंत्री दादा भुसे उपस्थित होते. तसेच एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, सामाजीक कार्यकर्त्या ज्योती पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमी रुग्णांची विचारपूस केली. तसेच शहापुरातील खासगी जीव रक्षक दल व सरलांबे येथील तरुण अपघातस्थळी मदत करत असल्याचे दिसून आले. एनडीआरएफ ची कुमक पण दुर्घटना स्थळी पाचारण करण्यात आली असून जोरदार होणाऱ्या पावसामुळे लोखंडी सांगाड्यात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
अशी आहेत मृतांची नावं
१) अरविंदकुमार उपाध्याय ३३ उप
२) गणेश रॉय ४३ प. बंगाल
३) ललन राजभर ३८ उप
४) परमेश्वर सहानी २५ उप
५) प्रदीप रॉय ४५ प बंगाल
६) राजेश शर्मा ३२ उत्तराखंड
७) संतोष जैन ३५ तामिळनाडू
८) राधेश्याम यादव ४० उप
९) आनंद यादव २५ उप
१०) पप्पूकुमार ३० बिहार
११) कनन ४० तामिळनाडू
१२) सुब्रत सरकार २३ प बंगाल
१३) सुरेंदर पासवान ३५ उप
१४) बलराम सरकार – प बंगाल
१५) लवकुश रामुदिन साव २८ बिहार
जखमी
प्रेमप्रकाश उपाध्याय ३७ बिहार शहापुर उपजिल्हारुग्णालय
ठाणे
किशोर हिव ४०
चंद्रकांत वर्मा ३६
या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही शासनातर्फे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे असंही जाहीर केलं.