नांदेड :उमरी तालुक्यातील भायेगाव येथील गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एक महिला व दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि. ७)रोजी दुपारी घडली. गोदावरी नदीला भरपूर पाणी आल्यामुळे मृतदेह काढण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला. या दुर्दैवी घटनेने भायेगाव गावावर शोककळा पसरली आहे.
गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या उमरी तालुक्यातील भायेगाव येथील महानंदा भगवान हनमंते (वय ३६), महानंदाची मुलगी पायल भगवान हनमंते (वय १४) आणि ऐश्वर्या मालू हनमंते (वय १२) वर्ष या तिघीजणी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीकाठावर चिखल, गाळ साचलेला होता. गोदावरी नदीला भरपूर पाणी आले होते.
कपडे धूत असताना महानंदा हनमंते ही पाय घसरून नदीच्या पाण्यात पडून बुडत असताना तिची मुलगी पायल हिने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु तिचाही पाण्यात तोल गेला. दोघीही पाण्यात बुडत असल्याचे पाहून ऐश्वर्याने आरडाओरड करत त्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐश्वर्याचासुध्दा पाय घसरून तोल गेल्यामुळे पाण्यात पडली. वरील तिघीजणी पाण्यात बुडाल्याची माहिती जेव्हा गावकऱ्यांना समजली तेव्हा गावकऱ्यांनी गोदावरी नदीकडे धाव घेतली.
घटनास्थळावर उमरीचे पोलीसही पोहचले. पाण्यात बुडालेल्या तिघींना शोधून काढण्याचा अथक प्रयत्न केला; परंतु पाणी जास्त असल्याने लवकर शोध लागला नाही. या दरम्यान तिथे एक बोट आणण्यात आली व लांब बांबू टाकून शोध घेतला आणि लोखंडी गळ टाकून पाण्यात फिरवले तेव्हा दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या तिघींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सर्व मृतदेह एका बोटीत टाकून गोदाकाठावर आणण्यात आले. तिघींचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याने भायेगाव गावावर शोककळा पसरली. या तिघींचे मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती भायेगाव येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील भायेगावकर यांनी दिली.
मागासवर्गीय वसतीतील बोअर नादुरुस्त असल्याने मागील पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बोअर नादुरुस्त असल्याने या भागातील महिलांना गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. यातूनच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे येथील नागरिक सुमेध कदम यांनी सांगितले आहे.