शिवसेना पक्ष फूटल्यानंतर पक्षाचे दोन गट पडले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिंदे गट हा महायुतीत भाजपा आणि अजित पवार गटाबरोबर (राष्ट्रवादी) आहे. महायुतीची राज्यात सत्ता आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षातील बहुसंख्य आमदार, खासदार हे एकनाथ शिंदेंबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट कमजोर झाला आहे. अशातच ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. यावर दोन्ही पक्षांमधील मोठ्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील यावर आपली भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे हे इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं की, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत चर्चांमध्ये किती तथ्य आहे? तसेच राज ठाकरे शिवसेनेत परत येण्याच्या काही शक्यता आहेत का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. या जर-तरच्या गोष्टींवर बोलू नका, त्याला काही अर्थ नसतो. आत्ता जे आहे त्यावर आपण बोलू.

आदित्य ठाकरेंच्या उत्तरानंतर त्यांना राज ठाकरेंसाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत का? युतीच्या मार्गाने किंवा कुटुंबाचे दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी २०१३ ला या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आम्ही त्याच लोकांना आमचं कुटुंब मानतो जे वर्षानुवर्षे आमच्याबरोबर आहेत. आम्ही त्यांनाच गृहित धरतो. रक्ताच्या नात्यापेक्षा आमच्याबरोबर असणारी माणसं हीच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. पक्षाच्या चढत्या-उतरत्या काळात आमच्याबरोबर असणारी माणसं, माझ्या आजोबांच्या काळापासून आमच्याबरोबर असलेली माणसं, त्यांनाच घेऊन पुढं जायचं आहे.

ह ही वाचा >> आंदोलन गुंडाळण्यासाठी ५० खोक्यांची ऑफर? मॅनेज होण्याबद्दल मनोज जरांगे स्पष्टच बोलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही इंडिया आघाडीचंच बघा. इंडिया आघाडीत आता असे काही पक्ष आहेत जे आमच्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करत होते, आम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करत होतो. परंतु, आता आम्ही एकत्र आलो आहोत. देशासाठी, राज्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे.