प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या होत्या. पण, शिवसेनेत आल्यावर प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. याला आता आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“ठाण्यातील मेळाव्यात राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना क्षमा नाही, असं म्हटलं. प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तिथून शिवसेनेत आल्यावर चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की, ‘प्रियंका चतुर्वेदींची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली.’ त्या प्रियंका चतुर्वेदी आता दुसऱ्यांना गद्दार म्हणतात,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शिरसाट यांच्या वक्तव्यावर वरळीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने आदित्य ठाकरे यांना विचारलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “गद्दार आमदारांची किंमत त्यांना कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? हा प्रश्न पडतो. याचं दु:ख देखील होतं. पण, जनता त्यांना जागा दाखवेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पांना विरोध करून भांडवल केलं’, असं संजय शिरसाट म्हणाल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “ज्यांना जेवढी किंमत आहे, तेवढीच देऊया. जास्त बोलून त्यांना मोठं करणे योग्य नाही. त्यांच्या गटात त्यांना जिथे ठेवायचं आहे, तिथे ठेवलं आहे.”