पंढरपूर : आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांच्या मनात वारकऱ्यांविषयी कटुता आहे, हे सिद्ध झाले. वारी आणि नमाज यातील मूलभूत फरक एका विधानसभा सदस्याला समजायला हवा, अशी टीका वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी केली आहे. तर, आम्ही मुस्लिम समाजाच्या हज यात्रा किंवा अन्य विषयांत टिप्पणी करत नाही. त्यांनीदेखील हिंदूंबाबत करू नये अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असे आव्हान भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी दिले.

अबू आझमी यांच्या वक्तव्याचे पडसाद पंढरपुरात उमटले.आझमी यांनी पालखी सोहळ्यामुळे रस्ता जाम होतो, या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. येथील हिंदुत्ववादी संघटनेने त्यांचा निषेध करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य रामकृष्ण वीर महाराज यांनी आमदार आझमी यांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. यातूनच वारकऱ्यांविषयी यांच्या मनात कटुता आहे हे सिद्ध होते. त्यांचा पालखी सोहळा आणि नमाज या दोन्ही गोष्टींचा रस्ता जाम होण्याशी संबंध जोडणे हास्यास्पद आहे. कारण सर्व कायदेशीर नियम पाळत वारकरी पंढरपूरला चालत जातात. त्यांचा मार्गच तो आहे. म्हणून गर्दीमुळे काही वेळा आपोआप रस्ता जाम ‘होतो’, तर दुसरीकडे ‘नमाजासाठी अनेक खुली ठिकाणे असतानाही बेकायदापणे ‘जाणीवपूर्वक रस्त्यावरच ठाण मांडल्याने रस्ता जाम’ केला जातो. हा मूलभूत फरक एका विधानसभा सदस्याला कळायला हवा!’ अशी टीका वीर महाराज यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आझमी या व्यक्तीला प्रसिद्धीचा हव्यास आहे. मुळात पालखी सोहळा हा वर्षातून एकदा असतो. आणि तो मार्गक्रमण करत असतो. मात्र, नमाज एका जागेवर बसून पढला जातो. मुळात कोणताही हिंदू समाज कधीही मुस्लिम समाजाच्या हज यात्रा किंवा अन्य विषयावर टीका-टिप्पणी करीत नाही. हिंदू नेहमी सहिष्णुता दाखवतात. मात्र, या आझमीला या गोष्टीचा विसर पडला आहे. त्यांनी माफी मागावी अन्यथा जशास तसे उत्तर देऊ’, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी दिला.