वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे.

“ महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झालेल्या असताना, सरकार बदललं. कदाचित या सरकारने देखील प्रयत्न केलेले असावेत, पण ५ सप्टेंबर रोजी जेव्हा अग्रवाल हे पंतप्रधानांना भेटले आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलायला सुरुवात झाली.” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

फॉक्सकॉनचं जर अद्याप गुजरातमध्ये काही निश्चित झालेलं नसेल, तर… –

याचबरोबर “फॉक्सकॉन प्रोजेक्टमधून महाराष्ट्रामधील दीड लाख युवकांना नोकरी मिळाली असती. परंतु हा प्रोजेक्ट गुजरातला गेला. महाराष्ट्रात तळेगावला जागा निश्चित झाली होती, परंतु आता गुजरातमध्ये ते जागा शोधत आहेत. म्हणजे इथे ताट वाढलं होतं आणि गुजरातमध्ये आता त्यांनी जेवण तयार करण्याची सुरुवात केली आहे, लाकडं गोळा करत आहेत. म्हणजे जर त्यांना जमीन अद्याप तिथे मिळालेली नसेल आणि असे दोन-तीन प्रोजेक्ट गुजरातमध्ये आले होते. परंतु ज्या जमिनी आता फॉक्सकॉनला दिल्या गेल्या त्या जमिनी त्यांना देऊ केल्या होत्या, परंतु त्यांनी ती जागा घेतली नाही व ते प्रोजेक्ट आता गुजरातला राहिले नाहीत. त्यामुळे फॉक्सकॉनचं जर अद्याप गुजरातमध्ये काही निश्चित झालेलं नसेल, तर तो संपूर्ण प्रोजेक्ट महाराष्ट्रात कसा येईल यासाठी आताच्या सरकारमधील नेत्यांनी प्रयत्न करावेत.” असंदेखील रोहित पवार यांनी यावेळी बोलून दाखवलं.

पाहा व्हिडीओ –

हे म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही … –

“Vedanta Foxconn ने महाराष्ट्रात जागा निश्चिती केली असतानाही राजकीय उदासिनतेमुळे गुजरातमध्ये गेलेला हा उद्योग अजूनही तिकडं जागेचा शोध घेतोय. हे म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही त्याकडं दुर्लक्ष करुन दुसरीकडं जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा जमा करण्यासारखा प्रकार आहे. वेदान्त-फॉक्सकॉनवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राज्यातील युवकांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळं डबल इंजिनचा प्रचार करणाऱ्या राज्य सरकारने हा उद्योग महाराष्ट्रातच झाला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरावा, ही विनंती.” असं रोहित पवारांनी ट्वीट केलेलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दहा वर्षांत महाराष्ट्राचं महत्त्व कमी झालं –

“आपण जर आकडेवारी बघितली तर असंच दिसून येतं की मागील दहा वर्षांत महाराष्ट्राचं महत्त्व हे कमी करण्याचा असेल नाहीतर कदाचित तो आपोआप झाला असेल. या गोष्टी सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेत. कोणतंही सरकार आलं तरी महाराष्ट्राची ताकद वाढवणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे न जाणवता तुम्ही जर केंद्रातील मोठ्या नेत्यांना बोलू शकत नसाल आणि त्यामुळे महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत असेल, तर कुठंतरी काळजी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यामुळे असे प्रोजेक्ट जर बाहेर गेले तर यांना कोण संधी, नोकरी देणार? याचा विचार सर्वच नेत्यांनी केला पाहिजे.” असंदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी म्हटलं.