अहिल्यानगर : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे अहिल्यानगर शहरातील तिरंगा फाउंडेशन, राजे ग्रुप, वाडिया मॉर्निंग ग्रुप व सुप्रभात ग्रुपकडून भारतीय सैन्याचे कौतुक करण्यात आले आहे. तरुणांनी फटाके फोडून, तिरंगा फडकवून मोठा जल्लोष केला. शहरातील टिळक रस्त्यावर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी हा जल्लोष आज सकाळी करण्यात आला. यावेळी तरुणांनी ‘भारतमाता की जय’, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगत संभाजी कदम म्हणाले, की भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून लष्करे तोयबा, जैशे मोहमंदसारख्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर मिसाईलने हल्ले करून ते नेस्तनाबूद केले व जशास तसे उत्तर दिले, ही बाब भारतीयांना अभिमानाची असून त्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन.
डॉ. सतीश फडके यांनीही भारतीय सेनेचे कौतुक करत अभिनंदन केले. यासाठी सर्वश्री दयानंद वाबळे, प्रवीण बेंद्रे, अतुल डागा, संतोष बोथरा, मनीष सोहनी, योगेश चुत्तर, संतोष तनपुरे, आकाश भन्साळी, अनिल येलमाने, अनिल गुंजाळ, संतोष गाडे, सारंग उदवंत, मनोज जैन, गणेश पालवे, सुभाष काळे, संतोष धोत्रे, शिवाजी शिंदे, नवरत्न डागा यांनी पुढाकार घेतला होता.