अहिल्यानगर : इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडे ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज व अधिक प्रमाणात उपलब्ध असलेल्या जागा पाहता यंदा ११ वीच्या शेकडो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिक्त जागांचा फटका कला व वाणिज्य शाखेला बसणार आहे. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

शिक्षण विभागाने यंदापासून जिल्ह्यात प्रथमच ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीय पद्धत अवलंबिली आहे. जिल्ह्यात यंदा १० वी उत्तीर्णांची संख्या ६१ हजार ४१२ आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील ५१७ कनिष्ठ महाविद्यालयातून ११ वी प्रवेशाच्या ८० हजारावर जागा उपलब्ध आहेत आणि अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने केवळ ५२ हजार २३२ अर्ज प्राप्त झालेले आहेत.

उपलब्ध जागा अधिक, त्या तुलनेत दहावी उत्तीर्णांची संख्या कमी आणि पुन्हा अकरावी प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची संख्या त्याहून कमी. यामुळे शेकडो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दहावी उत्तीर्णनंतर आयटीआय, पदविकांचे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याकडेही विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात अकरावीसाठी अर्ज केलेले असले तरी प्रत्यक्षात किती संख्येने विद्यार्थी प्रवेश घेणार, त्यावर रिक्त जागांचे प्रमाण ठरेल. तरीही शेकडो जागा रिक्त राहणार आहेत. शिक्षण विभागाकडूनच उपलब्ध झालेली आकडेवारी ही तफावत स्पष्ट करते आहे.

जिल्ह्यातील ५१७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व प्रकारच्या शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्याच माहितीनुसार जिल्ह्यात अकरावीसह इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण ९१ हजार ३१० जागा उपलब्ध आहेत.

२६ जूनला पहिली यादी

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २६ जूनला जाहीर होणार आहे. अद्याप दुसऱ्या गुणवत्ता यादीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनाचा कोटा १० टक्के, अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थांतील ५० टक्के जागा राखीव व त्याच शिक्षण संस्थेत (इन हाऊस) घेतलेल्या, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के राखीव जागा, अशा एकूण सुमारे १४ हजार जागा राखीव आहेत. याशिवाय सरकारी आरक्षण वेगळे. शिक्षण विभागाच्या सुधारित आदेशानुसार इन हाऊस कोट्यासाठी यापूर्वी केवळ संबंधित शाळा असा उल्लेख होता, त्याऐवजी आता महसुली जिल्ह्यातील शाळा असा बदल करण्यात आला आहे. पहिली फेरी जाहीर केल्यानंतर संबंधित शाळांनी पुन्हा रिक्त जागा कळवायच्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षक संचमान्यतेवर परिणाम

इयत्ता दहावी उत्तीर्ण संख्या, अकरावी प्रवेशासाठी आलेले अर्ज व एकूण उपलब्ध असलेल्या जागांची संख्या पाहता, ११ वीच्या अनेक जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिक्षक संच मान्यतेवर त्याचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. कला व वाणिज्य शाखेच्या अधिक जागा शिल्लक राहतील. – सुनील पंडित, अध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक संघ.