अहिल्यानगर : महावितरणकडून देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मुळा धरणावरील ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिनीवर मंगळवारी (दि. १२) सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. याचवेळेत महापालिकाही शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीची कामे करणार आहे. परिणामी मुळानगर व विळद येथील पाणी उपसा बंद राहणार असल्याने पुढील तीन दिवस शहराच्या विविध भागांतील पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार आहे.
महापालिकेने नागरिकांना तीन दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी (दि. १२) बोल्हेगाव, नागापूर उपनगर तसेच सावेडी उपनगरांतील पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रस्ता, विनायक नगर, आगरकर मळा, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर आदी भागास (सकाळी ११ नंतरच्या पाणीवाटपाच्या भागास) पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्याऐवजी दुसऱ्या दिवशी म्हणजे पाणीपुरवठा बुधवारी (दि. १३) करण्यात येईल.
तसेच बुधवार रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच विशेषतः मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, बुरुडगांव रस्ता, सारसनगर भागास पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १४) होईल.
गुरुवारी सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर तर सावेडी भागास शुक्रवारी (दि. १५) पाणीपुरवठा करण्यात येईल. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरांत ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आले, अशा भागांत पाणीपुरवठा करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मुळा धरणात जरी पुरेसा पाणीसाठा असते तरी नगर शहराला एक दिवसआडच पाणीपुरवठा होतो. उपनगरातून काही ठिकाणी दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यात एक दिवस जरी विलंब झाला तरी प्रत्यक्षात तीन तर काही ठिकाणी चार ते पाच दिवसांचा विलंब होतो. मुळा धरणातून शहराला पुरवठा होईल इतका उपसा केला जातो मात्र अंतर्गत वितरण व्यवस्था सक्षम नसल्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे शहराला रोज पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजना व फेज-२ योजना राबवली गेली. मात्र या योजना कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अपूर्णच राहिल्या आहेत.