महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोन अधिवेशनं पार पडली. या अधिवेशनांमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवारांनी अनेक प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरलं. पण या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर काहीशी सावधपणे टीका केली. ते संरक्षणात्मक टीका करताना दिसले. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दुजोरा दिला. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

“अजित पवार माझ्यावर सावधपणे टीका करतात” या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेबद्दल विचारलं असता अजित पवारांनी मिश्किल विधान केलं आहे. सभागृहात आम्ही एकमेकांची गचांडी धरावी, असं तुम्हाला वाटतं का? असं विधान अजित पवारांनी केलं. ते ‘सकाळ’ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- “जर कुणाला मस्ती आली, तर ती…”, अजित पवारांनी आपल्या शैलीत टीकाकारांना सुनावलं!

यावेळी अजित पवार म्हणाले, “सभागृहात ज्यांच्या चुका होतील, त्यांच्याबाबत आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो. राजकीय जीवनात तुमचे कुणाबरोबर कसेही संबंध असू शकतात. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मैत्री होती. दोघं एकमेकांना भेटायचे. एकमेकांकडे जेवायला जायचे. हे आम्ही स्वत: बघितलं आहे. पण ज्यावेळी ते पक्षासाठी सभा घ्यायचे, तेव्हा दोघं एकमेकांवर तुटून पडायचे. शरद पवारांना बाळासाहेब ठाकरेंनी काय उपमा दिली होती, ते आपण ऐकलं आहे. शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंना छातीच्या बाबतीत काय उपमा दिली होती? हेही तुम्ही ऐकलं आहे, हे चालत असतं.”

हेही वाचा- “गुजरात दंगलीतल्या आरोपींना निर्दोष सोडणं ही संविधानाची हत्या”, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

“पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आमची राजकीय मतमतांतरे काहीही असली तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही एकमेकांचा बांध रेटला नाही. आम्ही एकमेकांची गचांडी धरावी, एकमेकांच्या अंगावर धावून जावं, असं तुम्हाला वाटतं का? काही भागात नेत्यांच्या अंगावर खुर्च्या फेकाफेकी होते, मारामारी होते, तसं आमच्यात झालं तरच आम्ही दोघं एकमेकांचे विरोधक आहेत, असं तुम्ही म्हणणार का?” असं मिश्किल विधान अजित पवारांनी केलं.

हेही वाचा- शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि माझा जन्म एकाच दिवशी २२ जुलैला झाला आहे. पण वर्ष वेगवेगळं आहे. आता यात आमचा दोष आहे का? आमच्या आई-बापाने मला जन्म दिला. त्यांच्या आई-बापाने त्यांना जन्म दिला. त्यामुळे आमच्यात साटलोटं आहे, असं काही मनात आणू नका. आमचं मन सांगतं की आम्ही अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडतो.”