राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवारांना सूचक इशारा दिला आहे. एकवेळ खासदार-आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेला निवडून येणं अवघड आहे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. याचं कारण सांगताना ते म्हणाले की, खासदार-आमदारकीच्या निवडणुकीत पक्ष मजबूत असेल तर जमून जातं, मात्र, जिल्हा बँक निवडणुकीत तसं होत नाही. यावेळी अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही टोले लगावले. ते रत्नागिरीत प्रचारसभेत बोलत होते.

“खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड”

अजित पवार म्हणाले, “खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड आहे. कारण पार्टी तिथं कार्यकर्ता याप्रमाणे पक्षाचा कार्यकर्ता तिथं मजबुतीने काम करत असेल तर आमदारकी-खासदारकीत जमून जातं. इथं मात्र, वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका. आज आपल्या राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर याच बँका चांगल्या आहेत.”

“एकावेळी राज्यात सर्वाधिक पीक कर्ज देणारी नाशिक जिल्हा बँक अडचणीत”

“एकावेळी राज्यात सर्वाधिक पीक कर्ज देणारी बँक नाशिक जिल्हा बँक होती. आज ही बँक अडचणीत आली आहे. सोलापूरची बँकही दिग्गज नेते असून अडचणीत आली. उस्मानाबाद जिल्हा बँकही अडचणीत आली. वर्धा, नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकाही अडचणीत आल्या आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे-नंदूरबार, वाशिम-अकोला, जळगाव, जालनाच्या बँका चांगलं काम करत आहेत,” असंही अजित यांनी नमूद केलं.

“संस्था उभ्या करायला अक्कल लागते, अडचणीत आणायला नाही”

अजित पवार म्हणाले, “सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही.”

हेही वाचा : दोषींची गय नाही, पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि … : अजित पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा”

“इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे. काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडू नका. विचारपूर्वक मतदान करा,” असं आवाहन अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या मतदारांना केलं आहे.