सध्या मराठवाड्यात ‘३०-३०’ घोटाळा चांगलाच चर्चेत आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात एका तरुणानं गुंतवणुकीचं आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याने सुरुवातीला २५ टक्के परतावा देऊन कन्नड तालुक्यातील आसपासच्या ३० गावातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांना डायरी सापडली आहे. या कथित डायरीमध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांचंही नाव असल्याची चर्चा आहे.

या घोटाळ्याप्रकरणी विचारलं असता अंबादास दानवे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गुंतवणुकीचा पैसा दुप्पट, तिप्पट करण्याच्या कोणत्याही योजनेत आपला विश्वास नाही. मी अशी कोणतीही गुंतवणूक केली नाही. या प्रकरणात पोलीस तपास करत असतील, तर आपण पूर्णपणे सहकार्य करू… अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- किरण खरात अपहरण प्रकरण; अर्जुन खोतकरांनीच गुंडांना सुपारी दिली, कैलास गोरंट्याल यांचा गंभीर आरोप

३०-३० घोटाळ्याबाबत विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले, “मला वाटतं हा तुमचा शोध आहे. या घोटाळ्याची अधिकृत कागदपत्रे कुठेही उपलब्ध नाहीत. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. या घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. मला राहायला स्वत:चं घरही नाही. मी आताही माझ्या वडिलांच्या घरात राहतो. तुम्हाला सगळ्यांना माझं घर माहीत आहे. तुम्ही बरेच लोक सकाळ-संध्याकाळ माझ्या घरी येत असता, माझी सगळी स्थिती तुम्हाला माहीत आहे,” अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली.

हेही वाचा- “अजित पवारांची ‘ती’ इच्छा लवकरच पूर्ण होईल”, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दानवे पुढे म्हणाले, “पैसा दुप्पट, तिप्पट किंवा चारपट करण्यावर माझा विश्वास नाही. असे अनेक लोक माझ्याकडे येत असतात, मी त्यांना सांगत असतो, असं झटपट श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. त्यामुळे मला वाटतं की, काहीजणांनी तथाकथित पद्धतीने माझं नाव नोंदलं असेल. त्यामुळे याबाबत तपास करण्यास माझी काहीही हरकत नाही.”