Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिस्त्री यांच्या अपघाती निधनावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महिंद्रा यांनी ट्वीट करत सायरस मिस्त्रींच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे.
आनंद महिंद्रा म्हणतात, ‘ही बातमी पचवणे कठीण आहे. टाटा हाऊसचे प्रमुख म्हणून सायरस यांच्या संक्षिप्त कार्यकाळापासून मी त्यांना चांगले ओळखत होतो. मला विश्वास होता की ते एक महान व्यक्ती बनतील. जर त्यांच्या आयुष्यासाठी इतर योजना असत्या तर ते एकदिवस महान व्यक्ती बनले असते. परंतु अशा प्रकारे त्यांचा मृत्यू व्हायला नको होता. ओम शांती’.
हेही वाचा- VIDEO: कोण होते सायरस मिस्त्री? गिरीश कुबेर यांच्याकडून जाणून घ्या
उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याची धक्कादायक बातमी ऐकून खूप दु:ख झालं. ते एक चांगले मित्र होता आणि सभ्य व्यक्ती होते. जागतिक बांधकाम क्षेत्रातील बडी कंपनी शापूरजी पालोनजी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी टाटा समूहाचंही नेतृत्व केलं आहे.
हेही वाचा-
सायरस मिस्त्री यांचं पालघरमध्ये अपघाती निधन
पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.