मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेले ध्वजारोहण.. संमेलन स्वयंपूर्ण होण्यासाठी साहित्य महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी महाकोशास निधी देण्यासाठी आवाहन करीत पसरलेला पदर.. कमी जागेत अनेक स्टॉल उभारल्याने ग्रंथनगरीत झालेली दाटीवाटी आणि पुस्तके-टेबलांची मांडामांड सुरू असल्याने ग्रंथप्रेमींना वाट काढण्यात आलेला अडसर अशा वातावरणात अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनातील ग्रंथप्रदर्शनास शुक्रवारी प्रारंभ झाला.
तत्पूर्वी, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार या वेळी उपस्थित होते. त्यानंतर आचार्य अत्रे सभागृहामध्ये ग्रंथघोषास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी या वेळी मान्यवर कवींच्या कविता समूहस्वरात सादर केल्या.
वारजे येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने वारजे परिसरातील साहित्यिक आणि ज्येष्ठ नागरिक अशी तीस-चाळीस मंडळी संमेलनाच्या वारीमध्ये सहभागी झाली आहेत. हे सर्व जण संमेलनातील कार्यक्रमांचा आनंद लुटत असून, दुसरीकडे छत्रपती संभाजीमहाराज ग्रंथनगरीमध्ये त्यांनी साहित्य आणि कवितासंग्रहाचा आपला स्टॉल सुरू केला आहे. कोथरूड परिसरात साहित्यसंमेलनाच्या आयोजनाबरोबरच अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात ही मंडळी सहभागी झाली आहेत, असे संयोजक दिलीप बराटे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीमहाराज ग्रंथनगरीचे उद्घाटन मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाल्यानंतर महामंडळाच्या महाकोशासाठी निधी देण्याचे आवाहन करीत अध्यक्षा डॉ. वैद्य यांनी रसिकांपुढे पदर पसरला. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीच प्रारंभी खिशात हात घालून पैसे टाकले. त्यानंतर उपस्थित रसिकांनीही या महाकोशासाठी निधी समर्पित केला.