मुंबईत २१ सप्टेंबर रोजी शिवसेना गटनेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी गटनेत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोदार भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर टीका केली. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील लक्ष्य केले. याच कारणामुळे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आता देशपांडेंच्या टीकेला उद्धव ठाकरे गटातील नेते तथा आमदार अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. गटनेत्यांच्या मेळाव्यामुळे विरोधकांनी धसकी घेतली आहे. मनसे पक्ष फक्त इशारे देण्याचे काम करतो, असे परब म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> दसरा मेळाव्यासाठी शेवटचा पर्याय काय? शिवसेना रस्त्यावरची लढाई लढणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

मनसेकडून इशारे देण्याचेच काम चालते. कालच्या मेळाव्याच्या गर्दीने शिवसेनेला एकही ओरखडा पडलेला नाही हे सिद्ध झाले आहे. कालच्या मेळाव्यामुळे सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशा वल्गना, प्रतिक्रिया दिल्या जाणारच. आमचे लक्ष यांच्याकडे नसून कामाकडे आणि मुंबईकडे आहे, असा पलटवार अनिल परब यांनी केला.

हेही वाचा >>> “किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल, अन्यथा…” दापोली रिसॉर्ट प्रकरणावर अनिल परबांचे महत्त्वाचे विधान

यावेळी त्यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा आणि पक्षाची आगामी रणनीती यावरही भाष्य केले. महापालिकेच्या निर्णयानंतर आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या (२३ सप्टेंबर) न्यायालयात आमच्या याचिकेवर निर्णय दिला जाईल. त्यानंतर शिवसेना आगामी रणनीती ठरवेल. पालिकेने दोन्ही गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. कदाचित पोलिसांनी पालिकेला याबाबत अहवाल दिला असेल. या अहवालाच्या आधारावरच पालिकेने तसे पत्र दिले असेल. या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. उद्या या सर्वाचीच न्यायालयात चर्चा होईल. उद्या न्यायालय निकाल काय देणार हे पाहिले जाईल. त्यानंर रस्त्यावरची लढाई लढायची की नाही ते ठरवले जाईल, असे अनिल परब म्हणाले.

हेही वाचा >>>मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितले मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण; म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे…”

मनसेचे संदीप देशपांडे काय म्हणाले होते?

“बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं आहेत. मग यांना काय उत्तर द्यायचं? यांचं स्वत:चं कर्तृत्व शून्य आहे. म्हणून मग कुणाला मिंधे, कुणाला मुन्नाभाई, कुणाला आणखी काही म्हणत राहायचं”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी टीका केली.

हेही वाचा >>> “ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

संदीप देशपांडे यांनी ट्वीटमधूनही संजय राऊतांचं नाव घेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती. उद्या तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल. तयारी ठेवा”, असं आपल्या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणाले आहेत.