Anjali Damania on Bhagwan Shastri Maharaj : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे गोत्यात आले आहेत. याप्रकरणी एक आरोपी वगळता इतरांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीला जोर धरलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावेही दिले होते. आता त्या थेट भगवंत गडाचे महंत  डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनाही पुरावे दाखवणार आहेत. कारण,  डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली असून यामुळे अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेत गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली.  याविषयी माहिती देताना डॉ.नामदेव महाराज शास्त्री म्हणाले, “धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असं महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गडावर पत्रकार परिषद घेऊन त्यांची ही भूमिका स्पष्ट केली. त्यावर अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “भगवान गड आपल्यासर्वांसाठी पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं आणि अशी पाठराखण केली जावी याचं वाईट वाटलं. आपण कोणीही मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो, तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. पण नामदेव शास्त्रींना कदाचित धनंजय मुंडे यांच्याविषयी माहिती नसावी आणि म्हणून त्यांनी असं विधान केलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अतिशय आदरपूर्वक मला म्हणावंसं वाटतंय, तुम्हाला एवढी माहिती नसेल तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचते. बोलणारे लोक कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीत. जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली जात आहे. मी जे धनंजय मुंडेंविरोधात बोललेय, जे तथ्य आहे तेच सांगितलं आहे. अतिशय आदरपूर्वक नामदेव शास्त्रींना सांगावं वाटतं की असं व्हायला नको होतं”, अशी खंतही अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.