Anjali Damania On Beed Crime : बीडच्या परळीतील जलालपूर भागात एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. या मारहाण प्रकरणात परळी पोलीस ठाण्यात दहाहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.

बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर केलं पाहिजे

बीडमध्ये झालेल्या या मारहाणीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना अंजली दमानीया यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतावादी तळांवर कारवाई करण्यासाठी चालवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला आहे. बीडमधील गुन्हेगारीच्या विरोधात देखील ऑपरेशन सिंदूर करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

“बीडचं परळी म्हणजे दहशतीचा अड्डा झाला आहे. हे गंभीरतेने घ्यायला हवं. काल जी मारहाण झाली त्यातील सर्व मुलं ही १८ वर्षांच्या आसपासची होती….आणखी एक व्हिडीओ आला होता ज्यामध्ये त्यांनी ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने पाया पडायला लावलं होतं, त्यावरून असं वाटतं की बहुतेक ही एक रिव्हेंज केस होती. कुठेतरी हे सगळं भलत्या दिशेने जात आहे. जसं आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केलं होतं, तसं आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करायची गरज आहे असं मला वाटतं,” असे अंजली दमानिया म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय झालं?

जलालपूर येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान दोन गटात हाणामारी झाली होती. याचाच राग मनात धरून शिवराज नारायण दिवटे याचे दहा ते बारा युवकांनी अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेत जबर मारहाण केली. या टोळक्याला शिवराज दिवटे हा तरूण मारू नका अशी याचना करत विव्हळत असताना देखील त्याला काठी, बेल्ट आणि इतर हत्यारांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी कारवाईची मागणी केली जात होती. दरम्यान याची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेत रात्रीतून गुन्हा दाखल केला आहे. यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.