ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दोन दिवसांपूर्वी पुन्हा नव्याने चिठ्ठी पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ.पद्मसिंह पाटील पराभूत झाल्यास तुझा पवनराजे करू, असे या धमकीत म्हटले आहे. या धमकीसाठी एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे लेटरपॅड वापरण्यात आले आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप असून, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. अण्णा हजारेंनी निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन दिले नसले तरी उस्मानाबाद मतदार संघातील डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध जातीने प्रचार करत होते.
यापूर्वीही अनेकदा अण्णा हजारे यांना फोनवरुन तसेच पत्राद्वारे धमक्या देण्यात आल्या आहेत. आता त्यांना पुन्हा एकदा धमकी आल्याने खळबळ उडाली. नुकतीच अण्णा हजारे यांनी आपल्या नव्या अभियानाची घोषणा केली आहे.