”महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणारे चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावाले कोमात आहेत की काय?” असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुश्रीफ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता ते म्हणाले, ”भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारबद्दल नाराजी व आंदोलन केल्याकडे लक्ष वेधल आहे. पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. १०२  व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार नाहीत. तसेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही व गायकवाड समितीचा अहवालही विश्वासार्ह नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.”

“महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल,” चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान

दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेली  विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला. तर, चंद्रकांत पाटील हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका करीत आहेत. याबद्दल विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ”गेले अठरा महिने राज्य सरकार  चांगले चाललेले आहे. सरकार तर पाच वर्षे चालणार आहेच आणि त्याचा बोनस त्यानंतर त्यापुढच्या पाच वर्षात मिळणार आहे.”

“आम्हालाही आक्रमक होता येतं!”, मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले!

मुश्रीफ यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली “सेव्ह मेरीट-  सेव्ह नेशन” ही संघटना भाजपा आणि आरएसएसशी संबंधित आहे. या संघटनेचे पदाधिकारी भाजपा आणि आरएसएसचेही पदाधिकारी आहेत.

“संभाजीराजेच्या भूमिकेचे स्वागत…..”
संभाजीराजे छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटले आहेत. मराठा आरक्षणाबाबत तुझं-माझं करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढूया ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यांनी अनेक विधीतज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे सांगतानाच मुश्रीफ म्हणाले, आरक्षणाचे हे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे, केंद्राकडे जावे लागेल. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले पाहिजेत.

भाजपाचा तिहेरी डाव –
एकाबाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असा प्रयत्न करायचा. दुसऱ्या बाजूला टिकणार नाही असे आरक्षण द्यायचे. तसेच मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून  आंदोलनासाठी उचकवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा तिहेरी डाव आहे, असे सांगतानाच मंत्री मुश्रीफ म्हणाले, काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are bjp in a coma with chandrakant patil hassan mushrif msr
First published on: 28-05-2021 at 21:26 IST