स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं, पण आता मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होत आहेत. विद्यार्थी सोशल मीडियावर अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवारांनी एका विद्यार्थ्याचे ट्विट रिट्विट करत अजित पवार हे शब्द पाळणारे नेते असल्याचे म्हटले आहे. 

रोहित पवार म्हणाले, “अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत. एमपीएससी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.”

चंद्रकात पाटीलांनी देखील केली टीका

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आजवर अनेक वेळा म्हटलं की, अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. अजित पवारांसारखा शब्दाला पक्का माणूस नाही. पण आता शब्द पाळायला हवा होता, मात्र त्यांनी शब्द फिरवणं म्हणजे आश्चर्य आहे”, असं पाटील म्हणाले.

“खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झालं की, वेळ मारून न्यायची एवढच यांचं काम आहे. घोषणा करायची, मात्र काही अंमलबजावणी करायची नाही; याबाबत उत्तम उदाहरण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याच्याबाबत विधानसभेत करण्यात आलेली घोषणा. शब्द दिला पण तो शब्द पाळला नाही. प्रत्येक विषयावर थापा मारणार का?”, असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.