Ashish Shelar On Raj Thackeray and Uddhav Thackeray Victory Rally : राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्यांवरून मागील काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं होतं. त्यानंतर अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला. हा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले आहेत.
तसेच उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तसेच भाषेसाठी नाही ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याचं म्हणत भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’ आठवल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
“भाषेसाठी नाही ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी!, महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’ आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
“भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार, त्यासाठी सत्ता…यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.