कोकणवासीयांना यंदाच्या वर्षी अभूतपूर्व प्रतीक्षा करायला लावलेला मान्सूनचा दमदार पाऊस अखेर सोमवारी बरसायला सुरुवात झाली.     गेला सुमारे सव्वा महिना कोकणात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. त्यामुळे भातशेती करपण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होण्याची भीती वाटू लागली होती. अशा चिंतातुर वातावरणात सोमवारी सकाळपासून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्य़ात खऱ्या अर्थाने पावसाळी हवामान निर्माण झाले. त्यापाठोपाठ दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी पडायला सुरुवात झाली. दुपारनंतर त्यांचा जोर आणखीच वाढला आणि मान्सून स्थिरावू लागल्याची सुचिन्हे दिसू लागली. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे कोकणात अनेक ठिकाणी लावणीच्या रेंगाळलेल्या कामांनाही वेग आला आहे.
दरवर्षी सर्वसाधारणपणे ७ ते १० जून दरम्यान कोकणात आगमन करणाऱ्या मान्सूनच्या पावसाने यंदा संपूर्ण जून महिना जवळजवळ दडीच मारली. ७-८ जूननंतर जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी कडकडीत ऊन पडू लागले. पावसाची अधूनमधून येणारी जोरदार सर वगळता पावसाळा सुरू झाल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्याची अपेक्षा होती. पण दोन दिवसांपूर्वी प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे तो पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दरवर्षी आषाढी एकादशीपर्यंत बऱ्याच भागातील लावणीची कामे पूर्ण होतात. पण यंदा आजअखेर जेमतेम पाच टक्के लावणी झाली आहे. आज सुरू झालेला पाऊस आणखी सलग काही दिवस अशाच प्रकारे पडत राहिला तर भातशेतीचे संभाव्य नुकसान बऱ्याच अंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.