मनोज जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासह हजारो मराठा आंदोलकही पायी यात्रेत सहभागी झाले आहेत. यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता आंदोलक म्हणून जरांगे-पाटलांच्या पायी मोर्चात सहभागी होणार आहे. सरकार म्हणून माझी भूमिका संपली आहे, असं बच्चू कडूंनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
बच्चू कडू म्हणाले, “जरांगे-पाटलांनी सांगितल्यानुसार सगे-सोयऱ्याच्या दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. सरकारनं दुरूस्त्यांवर सहमती दर्शवली आहे. सगे-सोयऱ्याचा प्रश्न मिटल्याचं जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकार निर्दयी झालं, असं म्हणता येणार नाही.”
हेही वाचा : “मराठा आरक्षणाबरोबरच लोकसभेला राजकीय भूमिका घ्यावी”, प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर जरांगे-पाटील म्हणाले…
“सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक”
“५४ लाख कुणबी नोंदी आढळल्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी भूमिका जरांगे-पाटलांनी मांडली आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला यश मिळावं आणि समाजाचं भलं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं बच्चू कडूंनी म्हटलं.
“सगे-सोयरेच्याबाबत सांगितलेले फेरबदल सरकारनं मान्य केले”
“समाजाचं भलं होण्याची भूमिका जरांगे-पाटलांनी घेतली आहे. मराठा आरक्षणाची धोरणात्मक लढाई जरांगे-पाटलांच्या आंदोलनामुळे जिंकली आहे. सगे-सोयरेच्याबाबत सांगितलेले फेरबदल सरकारनं मान्य केले आहेत. आता फक्त नोंदी सापडलेल्यांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे,” अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे.