अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे-फडणवीसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पण, अजित पवारांच्या बंडाची कुणकुण लागली होती, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.

“काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. अजित पवार हे सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे, हे जाणवत होते,” असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “करोनाच्या संकटात आम्ही चांगल्या पद्धतीने अडीच वर्षे काम केलं. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असे आम्हाला वाटत होते. पण, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मोठ्या संख्येने आमदार घेऊन बाहेर पडले, तेव्हा धक्का बसला. या बंडाचा वास सुद्धा आला नाही, याचं आम्हाला आश्चर्य वाटलं.”

हेही वाचा : “…अन् हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते”, ठाकरे गटाची पंतप्रधानांवर टीका

“आता पुन्हा एक वर्षानंतर नवा धक्का मिळाला आहे. काहीतरी होणार असे वाटत असताना, अचानक अजित पवार सरकारबरोबर जात उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांकडील आमदारांचा आकडा अद्याप कळू शकला नाही. काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. कारण, महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

“त्यावेळी झालेल्या सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३८ जागा आणि विधानसभेला १८० जागा मिळत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे वाटायचं की भाजपाला आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा कुठूनतरी सिग्नल येत असायचे. ईडी आणि अन्य कारवाया वाढल्या हे सुद्धा सिग्नल होते,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा : “आम्ही जर बोललो तर पळता भुई थोडी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजित पवार सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे. हे जाणवत होते. अजित पवारांनी २०१९ सालीही शपथ घेतलीच होती. भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी ही आघाडी तोडण्याची गरज वाटत असणार. त्यातून काही गोष्टी घडतील हे वाटत होते. कारण, अजित पवारांची काम करणे आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता, हे घडणार याची कुणकुण लागली होती,” असं बाळासाहेब थोरतांनी म्हटलं आहे.