सांगली : ज्या रंगमंचावर बालगंधर्वांचे पहिले पाऊल पडले ते मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह केवळ राजकीय आशीर्वादाने नूतनीकरणानंतर गेली १८ वर्षे अग्निशामक विभागाच्या व बांधकाम विभागाच्या पूर्तता प्रमाणपत्राविना सुरू आहे. संस्थानकालीन असलेल्या या हंसप्रभा नाट्यगृहाचे महापालिकेने नूतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असून, त्याचा वापर सध्या नाटकापेक्षा स्नेहसंमेलन, चर्चासत्र यासाठीच केला जात आहे.

मराठी नाट्यकलेची पंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या सांगली महापालिका क्षेत्रातील मिरजेत असणाऱ्या तत्कालीन हंसप्रभा नाट्यगृहाच्या व्यासपीठावरून बालगंधर्वांनी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. तत्कालीन मिरज नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या या हंसप्रभा नाट्यगृहाचे नूतनीकरण करून अद्ययावत सुविधा असलेले बालगंधर्व नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी सुमारे १५ कोटींचा खर्च करण्यात आला. यालाही आता दोन दशकांचा कालावधी उलटून गेला आहे. यानंतर देखभाल-दुरुस्तीसाठीही कोट्यवधींचा निधी या नाट्यगृहावर खर्च करण्यात आला आहे.

हेही वाचा…विरोधकांना संपवणाऱ्या जयंत पाटलांचा खरा चेहरा जनतेसमोर – निशिकांत पाटील

मात्र, नूतनीकरणानंतर नाट्यगृहाभोवती फिरून जाण्यासाठी रस्ताच नाही. आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची गाडी फिरून जाण्यासाठी दुहेरी वाटच नसल्याने अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही. तसेच नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस महापालिकेच्या जागेतच दुकान गाळे आहेत. त्यांचे पुनर्वसन केले, तर हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिपूर्ती प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. सध्या जे काही कार्यक्रम होतात त्यांना केवळ राजकीय हस्तक्षेपामुळेच परवानगी दिली जाते.

नाट्यगृहाची वातानुकूलन यंत्रणा सुरू नाही. त्यामुळे पंखे लावले, तर त्याचा ध्वनीवर परिणाम होतो. गाळेधारकांचे पुनर्वसन करून अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती हवी आहे. त्रुटी दूर केल्या, तर रंगकर्मींसाठी चांगले नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. – ओंकार शुक्ल, सप्तरंग सहयोगी कलामंच, मिरज

हेही वाचा…Uddhav Thackeray : “अरे सुपारी तोंडातून थुंक मग ‘आणि म्हणून’ असं सरळ..”, उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रंगभूमीवर पहिले पाऊल

संस्थान काळामध्ये १८९७ मध्ये हंसप्रभा नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. १९०५ मध्ये बालगंधर्व यांनी नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या शारदा नाटकातील भूमिकेच्या माध्यमातून रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले होते.