राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात थेट भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्षफुटीनंतर केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत विधान केलं होतं. त्यांनी आशीर्वाद देण्याचं काम करावं, असंही अजित पवार म्हणाले होते. यानंतर आता सत्तेत सामील होण्याआधी शरद पवारांनी काय सल्ला दिला होता? यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

पक्षफुटीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “पाठिमागच्या काळात देशात अनेक वेळा अनेक गोष्टी घडल्या आहे. काँग्रेसमध्येही फूट पडली होती. बऱ्याच ठिकाणी बरंच काही घडलं आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की, आता असं काही घडू नये, आता काहींनी (शरद पवार) आशीर्वाद देण्याचं काम करावं. आम्ही तर आवाहन केलंय की, आम्ही कुठे चुकलो तर वडिलकीच्या नात्याने त्यांनी सल्ला द्यावा. आम्ही असं म्हणत नाही की, आम्ही काम करतो म्हणजे आम्ही सर्वगुणसंपन्न आहोत. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचा गाडा हाकत असताना काही चुकीचं घडतंय, असं कुठल्या वडिलधाऱ्यांना वाटलं तर त्यांनी सांगावं. आम्ही लगेच चूक दुरुस्त करू. आम्हालाही राज्याचं आणि जनतेचं हित साधायचं आहे.” ‘पुढारी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा- सत्तेत आणि विरोधातही राष्ट्रवादीला ठेवणं ही शरद पवारांची खेळी? फडणवीस म्हणाले, “त्यांची खासियत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी बोललात, तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सल्ला दिला? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, “सगळ्यांशी जे बोलायचं होतं, ते बोललो आहे. पण काहीजण स्वत:चा हट्ट सोडायला तयार नसतील, तर शेवटी आम्ही तरी किती काळ थांबायचं? काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नसते. प्रत्येकाला ती महत्त्वाची वाटत असते. आम्हीही ३०-३५ वर्षे राजकारणात काम केलं आहे. त्यामुळे आम्हालाही खूप काही गोष्टी करून दाखवायच्या आहेत. आमची तशी इच्छा आणि आवड आहे.”