|| मोहनीराज लहाडे

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

नगर : जिल्हा परिषद, नऊ नगरपालिका आणि १५ बाजार समित्या अशा स्थानिक पातळीवरील निवडणुकांची रणधुमाळी येत्या काही दिवसांत नगर जिल्ह्यात सुरू होत आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते तथा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजप नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे यांच्या आधिपत्याखालील संस्थांचाही समावेश आहे.

नगरची जिल्हा परिषद सदस्य संख्या आता राज्यात सर्वाधिक, ८५ झाली आहे. ही वाढ तब्बल १२ जागांची आहे. त्यामुळे गट-जणांच्या रचनेत मोठय़ा प्रमाणात मोडतोड होणार आहे. जि. प. आणि नगरपालिकांतील संख्याबळाचे गणित त्यानंतर लगेचच होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीशी निगडित आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दंड थोपटायला सुरुवात केली आहे. नेत्यांचे दौरेही सुरू झाले

आहेत.

नुकत्याच झालेल्या पारनेर, कर्जत व अकोले पालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मोडतोड करून तिन्ही राजकीय पक्षांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सोयीनुसार स्वतंत्र आघाडय़ा केल्या होत्या. भाजपने स्वबळावर लढवली. त्यापेक्षा वेगळे चित्र आगामी निवडणुकीत नसेल. जिल्हा परिषद गट-गण रचनेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर झाला आहे. आता कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहता, राहुरी व देवळाली प्रवरा या नऊ नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. सर्वच बाजार समित्यांच्या मुदती संपल्या आहेत. राजकीय सोयीनुसार काहींवर प्रशासक नियुक्त झाले तर काहींना मुदतवाढ मिळाली. सेवा संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, त्यासंपताच बाजार समित्यांच्या निवडणुका सुरू होतील. सेवा संस्थावर वर्चस्व मिळवण्यातून बाजार समित्यांसाठी चाललेली रस्सीखेच लक्षात  येते.

विधान परिषदेवरील राष्ट्रवादीचे सदस्य अरुण जगताप यांची मुदत गेल्या डिसेंबरमध्ये संपुष्टात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचे गणित जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या सदस्य संख्याबळाशी निगडित आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. निकषानुसार स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत नसल्याने विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली. त्यासाठी इच्छुकांनी यापूर्वीच तयारी सुरू केली आहे.

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने शिवसंपर्क अभियान, गट-गणानुसार उमेदवारीच्या चाचपणीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. शिवसेना युवानेते, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे दौरे झाले. जिल्हा शिवसेनेचे नेतृत्व आता मंत्री गडाख यांच्याकडे आले आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी, २७ फेब्रुवारीला शिर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, पक्षाचा डिजिटल सभासद नोंदणीचा कार्यक्रमही सुरू आहे. राष्ट्रवादीने १ मार्चला ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पूर्वतयारीची बैठक आयोजित केली आहे. याच निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या विद्यार्थी शाखेने ‘विद्यार्थ्यांचा जाहीरनामा अभियान’ उपक्रम सुरू केला आहे. भाजपच्याही गण-गटनिहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. मागील आठवडय़ात पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी १ मार्चला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. या निवडणुकांसाठी आघाडी करायची की स्वबळावर लढवायच्या यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते आजमावली जातील. लवकरच पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरू होतील. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अशीच व्यापक बैठक होणार आहे. -राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी शिवसंपर्क टप्पा-२ अभियानाच्या माध्यमातून पालिकानिहाय व गट-गणनिहाय आढावा बैठका सुरू आहेत. त्यासाठी संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे दौऱ्यावर आले आहेत. वरिष्ठ पातळीवरून आघाडी किंवा स्वबळाबाबत जो निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी केली

जाईल.  – राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख, शिवसेना

निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी शिर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे निर्णय जाहीर केलेला आहे. सध्या डिजिटल सभासद नोंदणीची मोहीम सुरू आहे. – बाळासाहेब साळुंखे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्वबळावर ताब्यात घेण्यासाठी पक्षाची तयारी सुरू आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बूथ व शक्ती केंद्रनिहाय बैठका सुरू आहेत. या बैठकातून राज्य सरकारचे अपयश, भ्रष्टाचार लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. – अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष, भाजप