अकोले : जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणारे भंडारदरा धरण ५० टक्के भरले आहे. अनेक वर्षांनंतर धरण जून महिन्यातच पन्नास टक्के भरले आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण ४५ टक्के, तर निळवंडे धरण ४३ टक्के भरले आहे.
मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. काल, बुधवारी दिवसभर कळसुबाई, हरिश्चंद्र गडाच्या डोंगररांगांत मुसळधार पाऊस पडला. रतनवाडी येथे १०१ मिमी, घाटघर ८९, भंडारदऱ्यात ७५, पांजरे येथे ७८ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे चोवीस तासांत भंडारदरा धरणात २८२ दलघफू नवीन पाणी आले. आज, गुरुवारी सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ४२१ दलघफू (४९.११ टक्के) झाला.
दोन दिवसांपासून मुळा नदीला चांगले पाणी असल्यामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत ३३८ दलघफू पाण्याची भर पडली. सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा ११ हजार ६०५ दलघफू (४४.६३ टक्के) होता. अन्य धरणांतील सकाळपर्यंतचा पाणीसाठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे होता-निळवंडे ३ हजार ५३० (४२.४३ टक्के), आढळा ८८२ (८३.२१ टक्के), भोजपूर २९५ (८१.७२ टक्के).