कोरेगाव भीमा हिंसाचार घटना आपल्या देशासाठी आणि राज्यघटनेसाठी खूप मोठा धक्का असून पोलिसांचं खच्चीकरण करणं योग्य नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे. जर ते निर्दोष असतील तर जामिनासाठी न्यायालयात दाद मागू शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

जातीय तेढ निर्माण करण्याचा कट उघडा पडला असून पोलीस कारवाई करत आहेत. पोलिसांचं खच्चीकरण करणं योग्य नाही. कोरेगाव भीमा हिंसाचार घटना आपल्या देशासाठी आणि राज्यघटनेसाठी खूप मोठा धक्का होती. न्यायव्यवस्था उपलब्ध आणि जर ते निर्दोष असतील तर न्यायालयात दाद मागू शकतात असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर बोलले आहेत.

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. पोलीस पुराव्यांशिवाय कारवाई करत नाही. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना अटक केली. सुधा भारद्वाज या कामगार नेत्या असून गौतम नवलाखा हे ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल वीकली’चे सल्लागार संपादक आहेत. वरवरा राव हे तेलंगणमधील प्रख्यात कवी आहेत. या अटकसत्राचा निषेधही होत आहे.

दुसरीकडे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशभरातील डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांवर आणि मानव हक्कांसाठी काम करणाऱ्या वकिलांवर केलेली अटकेची कारवाई बोगस आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेवरील लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे.