पंढरपूर : उन्हाळ्यात नेहमी कोरडे पडणारे भीमा नदीचे पात्र यंदा मात्र चक्क दुथडी भरून वाहत आहे. उजनी धरण लाभक्षेत्र, पुणे जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीमुळे येथील वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यातील एका मंदिरात तीन साधू अचानक आलेल्या पाण्यामुळे अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सातपट पाऊस पडला असून आषाढी यात्रेदरम्यान देखील पावसाची शक्यता आहे. त्या दृष्टीने नियोजन केल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
मे महिन्यात पंढरीच्या भीमा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. हे ऐकून खरे वाटणार नाही. पण राज्यात सर्वदूर पावसाने चांगलेच झोडपल्याने नदी नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. नीरा आणि भीमा लाभ क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने नीरा नदीतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. हे पाणी अकलूज जवळील संगमातून पुढे भीमा नदीला मिळते. त्यामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. तर दुसरीकडे भीमा लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने तेथूनही पाण्याचा विसर्ग वाढला आहे. परिणामी पंढरपूर येथील भीमा नदी दुथडी भरली आहे.
येथील वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील गुरसाळे येथील नदीकाठच्या एका मंदिरात तीन साधू पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकले होते. त्यांना स्थानिक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापणाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. नागरिकांनी नदी पात्राजवळ येऊन फोटो काढू नये तसेच भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ पट पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरी ३२ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र आत्ताच १७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. तसेच आषाढी यात्रा कालावधी म्हणजेच २५ जून ते १० जुलै या दरम्यान हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदा वारीच्या नियोजनामध्ये पाऊस पडला तर कोण कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार याचे नियोजन केले आहे. असे असले तरी मे महिन्यात पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या नागरिकांना पाणीच पाणी चोहीकडे असे चित्र सध्या दिसून येत आहे.