राज्यातील मोजक्याचं जिल्ह्यात असलेलं ‘बर्ड फ्लू’चं संकट आता राज्यभर पसरताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मृत पक्षी आढळून आले होते. त्यांचे अहवाल आले असून, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत बर्ड फ्लूने हातपाय पसरले आहेत. बर्ड फ्लूमुळे एकट्या परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.

देशातील सहा ते सात राज्यात ‘बर्ड फ्लू’ने थैमान घातलं आहे. इतर राज्यांपाठोपाठ ‘बर्ड फ्लू’ने महाराष्ट्रात शिरकाव करत हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी बर्ड फ्लूच्या विषाणूनं शिरकाव केला आहे. परभणीबरोबर मुंबई, ठाणे, बीडसह इतर जिल्ह्यात मृत पक्षी आढळून आले होते. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, प्रशासनाकडून  पाच जिल्ह्यात बर्ड फ्लूनं शिरकाव केला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- बर्ड फ्ल्यू – अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धनमंत्र्यांनी केली अत्यंत महत्वाची सूचना

परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यात आली आहेत. जवळपास ८० हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला! परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले होते. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. तर मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.