मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गळ्यात हार घालणार नाही असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. याआधी त्यांनी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा नेसणार नसल्याचं जाहीर केलं होतं. दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे असं जाहीर करताना पंकजा मुंडे यांनी मराठा समाज-ओबीसी समाजात भांडण लावल्याचं कटकारस्थान रचलं जात आहे असा आरोप केला. दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे सांगताना त्यांनी एकत्र आणून वज्रमूट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

माझ्या दौऱ्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना मिळणारी अतिवृष्टी मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि महिलांची सुरक्षा हे विषय मांडणार आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. “पंकजाताई घरात बसल्यात म्हणून खूश झालेल्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी दिल्ली, नवी मुंबई, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

“…कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी नाही,” पंकजा मुंडेंचं भगवानगडावर तुफान भाषण

पंकजा मुंडे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आपलं लक्ष लागलं आहे सांगताना जनहितार्थ घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तीन पक्षांचं सरकार असून एकमेकांना खूश करण्यासाठी जनतेला दुखी केलं जात आहे अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना शोभतील अशा कोणत्या खंबीर भूमिका ते घेतात याची मी डोळे लावून वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपाला घरचा आहेर

यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपालाही घऱचा आहेर दिला. “मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येत सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

“राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहेत…महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?,” अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही

“सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात,” अशी टीका पंकजा मुंडेंनी केली. “आता काय बीड जिल्ह्याची आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. एक रुपया तरी आहे का? माझ्याच योजना चालू आहे. आपलं मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं आहे यांनी. यांचं काहीच चालत नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीर अभिनंदन करु,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.