Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. मंत्रिमंडळात भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. पण या मंत्रिमंडळातून काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही डावलण्यात आलं. मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. आज (२२ डिसेंबर) छगन भुजबळ यांची राज्यभरातील ओबीसी नेत्यांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच पुढची भूमिका घेण्यासाठी आपण सर्वांशी चर्चा करत असून निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर मला त्यांनी सांगितलं की असं कसं होऊ शकतं? तुम्ही राज्याचं ओबीसींचं नेतृत्व करता. ओबीसींच्या प्रश्नांसाठी तुम्ही राज्यात आणि विधानसभेत प्रश्न मांडले. आता तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं, याचा अर्थ यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. कारण तुम्ही नेहमीच ओबीसींच्या मुद्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे आम्हाला भिती वाटते की हे वेगळं काहीतरी आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आता पुढे काय करायचं? ते आपण बसवून ठरवा. असं ओबीसी नेत्यांनी सांगितलं”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

हेही वाचा : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”

आता पुढची भूमिका काय असेल?

पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांना तुमची पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “माझ्या पुढच्या भूमिकेबाबत तुम्हाला घाई झालेली दिसते. मात्र, मला माझी भूमिका घ्यायला वेळ लागेल. त्यासाठी मी सर्वांशी चर्चा करत आहे”, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं.

‘काही वरिष्ठांना मंत्रिपद दिलं नाही, याचं कारण तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची असते’, असं अजित पवारांनी एका मेळाव्यात बोलताना म्हटलं. यासंदर्भात छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तरुणांना संधी द्यायची यासाठी व्याख्या ठरवली पाहिजे. मग त्यामध्ये किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचं? मग ६७ ते ६८ वर्षांपर्यंतही तरुण म्हणायचं का? हे ठरवलं पाहिजे ना?”, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला अगोदर सांगितलं असतं की तुम्ही निवडणुकीत उभं राहू नका, तर मी राहिलो नसतो. पाच महिन्यांपूर्वी मला लोकसभेत पाठवत होते, तेव्हा माझी संपूर्ण तयारी झाली. मात्र, तेव्हाही मला थांबवावं लागलं. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक आली तेव्हा म्हटलं मला राज्यसभेवर पाठवा. तेव्हा मला म्हणाले की, तुमची गरज राज्यात जास्त आहे. मग आता माझी गरज कमी झाली का? असं होतं तर मला निवडणूक लढवायला सांगायचं नव्हत. आज माझ्या मतदारसंघात एक वेगळं वातावरण निर्माण झालं ते झालं नसतं. आता सर्व झाल्यानंतर मला सांगतात की राज्यसभेवर जा. मी आता राज्यसभेत जायचं याचा अर्थ मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. मग मी राजीनामा कसा देऊ?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.