Chhagan Bhujbal On CM DCM : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवड्यांनी राज्यातील महायुतीचा सरकारचा शपथविधी पार पडला आहे. यामध्ये भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक मुख्यमंत्र्यांनी या शपथविधी सोहळ्याला हजरी लावली होती.

हळूहळू नाराजी दूर होते

दरम्यान राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांना आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील नाराजीबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश देण्यात आले, तेव्हा सुरुवातीला ते ही नाराज होते. पण नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. अशात पद्धतीने हळूहळू सर्वांची नाराजी दूर होत असते.

राष्ट्रवादीचे (अजित पवार) येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्याशी आज आयएएनएस या वृत्तसंस्थेने संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी महायुती, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. भुजबळ म्हणाले, “एका आठवड्यात सर्व चित्र स्पष्ट होईल. कोण मंत्री होईल, कोणाला कोणते खाते मिळेल हे सर्व कळेल.”

फडणवीसही सुरुवातीला नाराज होते

महायुतीतील नाराजीबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “महायुतीत कोणीही नाराज नाही. जेव्हा एखादा व्यक्ती वरच्या पदावरुन खालच्या पदावर येतो तेव्हा नाराज होणे स्वाभावीक आहे. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो, नंतर मंत्री झालो तेव्हा मीसुद्धा नाराज झालो होतो. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश आला तेव्हा तेही नाराज झाले होते. पण, त्यांनी याचा स्वीकार करत चांगले कामही करुन दाखवले. तेसुद्धा सुरुवातीला नाराज होते, पण नंतर कामाला लागले.”

हे ही वाचा : “बाबरी मशिद प्रकरणात न्यायाची थट्टा…” मशिदी आणि दर्ग्यांविरोधात दाखल होणाऱ्या खटल्यांवर माजी न्यायमूर्तींचे मोठे भाष्य

हे ही वाचा : “माझा पाय चार ठिकाणी मोडला होता…” विरोधीपक्षनेते असताना गडकरींसोबत काय घडलं होतं? गडकरी म्हणाले, “लोकांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीत रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३० हून अधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सुरुवातीला रस्सीखेच झाल्याचे पहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही होते. परंतू, भाजपाने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसल्याची चर्चा होती. पण काल झालेल्या शपथविधीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.