चिपळूण : चिपळूण तालुक्यातील वालोपे भोजवाडी येथे जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे दहा लाखाचे पाईप आणून ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी सर्व पाईन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
चिपळूण तालुक्यातील वालोपे गावाला २४ तास पाणी मिळावे, यासाठी मागील काही वर्षापासून स्थानिक ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला यश आल्यानंतर पाणी योजनेची प्रक्रिया सुरू झाली होती. तसेच या योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केला होता. या योजनेसाठी लागणारे पाणी आणून त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी साठा करण्यात आला होता. वालोपे भोजवाडी येथे सुमारे दहा लाखाचे पाईप आणून ठेवण्यात आले होते. हे पाईप मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत ठेवण्यात आले होते. महामार्गावरील सीएनजी पंपापासून काही अंतरावर हे पाईप ठेवण्यात आले होते. दुपारी अडीज वाजता या पाईपांना अचानक आग लागली. ही आग वणव्यामुळे लागल्याचे सांगितले जात आहे.
आगीची घटना नागरिकांना समजल्यानंतर सरपंच प्रतिक सुर्वे, उपसरपंच समिधा कदम, सदस्य सुनिल मोहिते, प्रविण आग्रे, पुजा पिंपुटकर, ग्रामसेवक विश्वास पवार, नीलेश गुरव व ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. पालिकेच्या अग्मिशामक दलाला बोलवण्यात आले. लोटे एमआयडीसीतील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाची यंत्रणा पोहचेपर्यंत पाईप जळून खाक झाले होते. हे पाईप सिमेंट क्रॉंक्रीट केलेल्या जागेवर ठेवण्यात आले होते. मात्र परिसरात सुकलेल्या गवताला आग लागली. त्यानंतर पाईप जळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.