Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई-सोलापूर विमान सेवेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. आज विमानसेवा सुरू झाली आहे आणि मुंबईहून येणारं विमान येथे उतरणार आहे. खरंतर मी त्या विमानानेच येणार होतो. मला गडचिरोलीला जावं लागलं, कारण आज सगळ्या नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी आपल्या बंदुकीसह गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं. आणि महाराष्ट्रातील माओवाद आम्ही पूर्णपणे संपुष्टात आणला म्हणून थेट तिथे गेले आणि तेथून सोलापूरला आलो. कारण सिद्धरामेश्वराच्या नगरीत जे पहिलं उड्डाण होतंय त्याला मला उपस्थित राहायचं होतं, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मी मागच्या वेळेस येथे आयटी पार्कची घोषणा केली होती, याचा उद्देश काय होता? फंक्शनल विमानतळ असल्याशीवाय आयटीपार्क कधी यशस्वी होत नाही. त्यामुळे मला ज्यावेळेस खात्री झाली की फंक्शनल विमानतळ इथे होतंय तेव्हा मी घोषणा केली. येत्या काळात जागा निश्चित होत आहे, आम्ही एक चांगला आयटी पार्क सोलापूरला तयार करणार आहोत. पुण्यात बसलेल्या सोलापूरच्या मुलांसाठी इथेच आपण रोजगाराची निर्मिती करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सोलापूरमध्ये आपण समांतर योजनेचं काम केलं. अनेक अडचणी आल्या, पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं. त्यातही कोर्ट केस पर्यंत प्रकरण गेलं, कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला. पण आपण ते काम आज पूर्ण केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. २४x७ आपल्याला लोकांना पाणी देण्यासाठी वितरणाच्या योजनेला हजार कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत?
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार याबद्दलही भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, “ज्या-ज्या वेळी शेतकरी अडचणीत असतो, त्या-त्या वेळी आमचं सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे असते. मला हे सांगताना आनंद वाटतो की, शेवटी शेतकर्यांचं जे नुकसान होतं, त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाहीत. पण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज आपण यावर्षी दिले. ३२ हजार कोटी रुपये आपण शेतकर्यांना दिले. शेतकर्यांच्या खात्यात पैसे जाणं सुरू झालं आहे. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकर्यांच्या खात्यात पैसे जातील. काहींना थोडे उशिराही मिळतील. आमचा प्रयत्न आहे की या महिन्यात ते शेतकर्यांच्या खात्यात गेले पाहिजेत.”
शेतकरी संकटात असताना त्याचे राजकारण केले जात असल्याबद्दलही फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. सोलापुरातील एका नेत्याला उद्देशून ते म्हणाले की, “मला कधीकधी आश्चर्य वाटतं. अतिवृष्टीसारख्या आपत्तीच्या वेळीही काही लोक राजकारण करतात. काही लोकांच्या डोक्यात तर इतका किडा गेलाय. सोलापुरात मला एक विधान ऐकायला मिळालं. त्यावर हसावं की रडावं मला कळत नाही. इथले एक नेते म्हणाले की सोलापूरमध्ये झालेला इतका पाऊस निसर्गामुळे नाही झाला, तर राज्य सरकारने आणला. हा महापूर राज्य सरकारने आणला….काही हरकत नाही. त्यांना एक फूल द्या आणि ‘गेट वेल सून’ सांगा. कधीकधी असा मानसिक परिणाम होत असतो. काळजी करण्याचं कारण नाही. पण हे सरकार कितीही आपत्ती आली, तरी आपल्या शेतकर्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहील,” असे देवेंद्र फडणीस म्हणाले.