मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली सभा ठाण्यात पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. दगाबाज कोण आणि वफादार कोण आहे हे जनतेने ठरवले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एवढंच नाही तर घरी बसणाऱ्या माणसाला शासन आपल्या दारी कसं कळणार? असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सत्तेची हवा डोक्यात गेली की लोक बरोबर लक्षात ठेवतात. आपला जन्म सत्तेसाठी झालेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कितीतरी वेळा सत्तेला लाथ मारली आहे. मात्र दुसरीकडे सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायमचं दूर केलं होतं त्यांना तुम्ही जवळ केलं असाही आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. एवढंच नाही तर आम्हाला बोलायला लावू नका, बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आमच्याकडे बोलायला बरचं आहे आणि आम्ही ते सांभाळून ठेवलंय हे विसरु नका असा इशाराच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

हे पण वाचा- “एकनाथ शिंदे-अजित पवार हे काल राजकारणात आले का?, मी मोहिनी घातली आणि…”, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी कुणी केली?

“बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवले, ज्या मतदारांनी निवडून दिलं, बहुमत दिलं, त्यांच्याशी दगाबाजी कुणी केली? आम्हीसुद्धा बोलू शकतो. आम्हालाही बोलता येतं. पण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची संस्कृती आणि परंपरा आहे. त्यांनी काही गोष्टी शिकवल्या. आम्ही मर्यादा सोडून बोलत नाहीत याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असं मानू नका. आमच्याकडे सगळं आहे. पण अजून ठेवलं आहे. काढायला लागलो तर पळता भुई थोडी होईल. तोंड लपवायला लागेल”, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- “२०१९ चा महागद्दार, राजकारणातला करंटा आणि महाकलंक व्यक्ती म्हणजे…”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

“देवेंद्र फडणवीस आज भाषणात म्हणाले की,जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो. बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलं आहे. अन्यायाविरुद्ध लढा. अन्यायाविरुद्ध पेटून उठा. अन्याय सहन करु नका, म्हणून आम्ही निर्णय घेतला”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. “मला मुख्यमंत्रीपद मिळेल, असा विचार कधी मनात धरलाही नव्हता. त्या काळात परिस्थिती तशी होती. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या सैनिकांचं खच्चिकरण होत होतं. केसेस लादल्या जात होत्या. तडीपार, मोक्का सारख्या कारवाया आपल्या पोरांवर होत होत्या. मग ही सत्ता काय उपयोगाची?”, असा सवाल शिंदेंनी आपल्या भाषणात केला.