खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय संबंध आहेत? तसेच गौतम अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांद्वारे गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? असा सवालही राहुल गांधींनी विचारला.

राहुल गांधींनी माफी मागितली असती, तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती, या चर्चेबद्दल विचारलं असता राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले, माफी मागायला माझं नाव सावरकर नाही. माझं नाव गांधी आहे. गांधी कुणाचीही माफी मागत नाही. राहुल गांधींच्या या विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली. राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून बघावं, मग त्यांना सावरकरांच्या यातना कळतील, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.

हेही वाचा- VIDEO : “माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; मी माफी मागणार नाही”, राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर

अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. सावरकर हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी मरण यातना भोगल्या आहेत. त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांना कोलूला जुंपलं. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हालअपेष्ठा भोगल्या. त्यामुळे राहुल गांधींनी एक दिवस त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं. अर्धा-एक तास त्यांना घाण्याला (कोलू) जुंपलं तर त्यांना सावरकरांच्या यातना काय आहेत, ते कळतील. म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे.”

हेही वाचा- Video: अदाणींच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कुणाचे? राहुल गांधींचा परखड सवाल, नेमका रोख कुणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “आजही राहुल गांधींनी म्हटलं, माफी मागायला मी सावरकर नाही. पण तुम्ही सावरकरांना काय समजता? असा माझा सवाल आहे. म्हणून त्यांना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.”