विरोधी पक्षनेत्याचं नाव आम्ही फायनल करु त्यानंतरच आम्ही त्यासंदर्भातला अध्यक्षांकडे त्या संदर्भातला प्रस्ताव सादर करु असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच आहे त्यामुळे आमच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्राचं सरकार हे लुटारु सरकार आहे अशीही टीका नाना पटोले यांनी केलं आहे. शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा केल्या, बेरोजगारांसाठी घोषणा केल्या, महागाई कमी करण्यासाठी घोषणा केल्या त्याचं काय झालं? असंही नाना पटोलेंनी विचारलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात की आमच्याकडे बहुमत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे सगळा उधारीचा गोळा केलेला शेंदूर आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- विधानसभेत पहिल्याच मिनिटात जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला; मुख्यमंत्र्यांनी नाव घेताच म्हणाले…!
भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेस पुढे येतो आहे कारण काँग्रेसला त्या प्रश्नांची जाण आहे असंही नाना पटोलेंनी पत्रकारांना सांगितलं. काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या जनतेने हे स्पष्ट केलं आहे की आम्ही विरोधात बसावं. काँग्रेस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडेल यात शंका नाही असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; नवीन चेहऱ्याला संधी
उधारीचा शेंदूर घेऊन हे सरकार काम करतं आहे
घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो असे फलक हातात घेऊन विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. त्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलत असताना सरकारवर घणाघाती टीका केली. उधारीचा शेंदूर घेऊन हे सरकार एकमेकांना फासतं आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या सरकारला सत्तेत बसण्याचा काहीही अधिकार नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलंं आहे.