मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काँग्रेसकडून या मुद्द्यावर तीव्र आक्षेप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. यासाठी विक्रम आणि वेताळच्या गोष्टीचा संदर्भ घेत त्यातील उपमा केंद्रीय तपास यंत्रणांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी यासंदर्भात केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि व्यावसायिक प्रविण राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यावरून सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो”, असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हा वेताळ म्हणतो, “तू बोला, मैं…”

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी मोदींचा वेताळ वेगळा असल्याचं म्हटलं आहे. “तू बोला मैं चला” नव्हे “तू बोला मैं आया”! भाजपा नेत्यांचा खांदा याला चालत नाही. वर्षानुवर्षे तो वेताळ झाडाला लटके. या वेताळाचा तपासही लटकलेला राहतो”, असं सावंत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

“हा वेताळ HDIL च्या खांद्यावर बसणार नाही”

दरम्यान, मोदींचा वेताळ एचडीआयएलच्या खांद्यावर बसणार नाही, असा खोचक टोला देखील सावंत यांनी या ट्वीटमध्ये लगावला आहे. संजय राऊत मोदी सरकार विरोधात बोलले. (त्यांच्या) भावाला लगेच अटक! १ जाने २०२१ रोजी प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त केली. मग तपास वर्षभर का लटकवला? याच HDIL ने भाजपला ₹२० कोटींची देणगी दिली. त्यांच्या खांद्यावर बसणार नाही”, असं ट्वीटमध्ये सावंत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरेगावमधील पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली इडीनं संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांना अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. संजय राऊत यांनी देखील आज सकाळी आपल्या ट्विटर हँडलवरून एक सूचक ट्वीट केलं आहे.