राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे ती राज्यसभा निवडणूक आणि त्यामध्ये शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या झालेल्या पराभवाची. महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या जोरावर दोन उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखणाऱ्या शिवसेनेला भाजपानं धक्का दिला आहे. संजय पवार पराभूत झाले असून भाजपा उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलेला असताना काँग्रेसकडून यासंदर्भात सूचक ट्वीट करून फुटलेल्या आमदारांना टोला लगावला आहे.

“लाखा कोण हे शोधा”

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी लगान चित्रपटाचं उदाहरण देत भाजपाच्या उमेदवाराला मतदान केलेल्या आमदारांना टोला लगावला आहे. “राज्यसभा निवडणुकीत दिसून आलेले ‘लगान’ चित्रपटातील ‘लाखा’ कोण आहेत हे महाविकास आघाडी सरकारने विधान परिषद निवडणुकीआगोदर तात्काळ शोधून काढावे”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी दिवसभर राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू होती. मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या काही आमदारांची मतं बाद ठरवावी अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात मध्यरात्री निवडणूक आयोगाने निर्णय देत महाविकास आघाडीचे सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं. मात्र, त्यानंतर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपाचे तीन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे सहावी अतिरिक्त जागा भाजपाने जिंकल्याचं स्पष्ट झालं आहे.