महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. महाडमध्ये आज शिवगर्जना सभेचे आयोजन केले आहे. या सभेला संबोधित करताना स्नेहल जगताप यांनी आपल्या पहिल्याच भाषणात शिवसेनेला जिंकून आणणारच असा निश्चय केला आहे.
स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या भाषणाला सुरुवात करताच त्यांनी आपल्या वडिलांचे स्मरण केले. “मी वडिलांचा हात धरून राजकारणात आले. त्यांची उणीव जाणवतेय. कोरोनाच्या काळात राज्य सांभाळत असताना तुम्ही कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका पार पाडली. तुमचं जगभरात कौतुक झालं. धारावी पॅटर्नचा अभ्यास अनेक संस्थांनी केला. महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनामुक्त कोणी केलं असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय आपल्याला जातं. याच कोरोनाने माझे वडील माजी आमदार मणिकराव जगताप यांना आमच्यापासून हिरावून घेतले. महाडमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्यांनी कोरोना सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. रुग्णांची काळजी घेताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि २६ जुलै २०२१ च्यांनी जगाचा निरोप घेतला, असं स्नेहल जगताप म्हणाल्या.
२२-२३ (जुलै २०२१) च्या रात्री या माझ्या शहरावर अस्मानी संकटाला ना भूतो ना भविष्यती अशा स्वरुपाचा जलप्रलय शहराने अनुभवला. एकीकडे वडील रुग्णालयात आणि दुसरीकडे माझं शहर पाण्याखाली. मी तातडीने मुंबईहून महाडला आले आणि माझ्या जनतेसाठी उभी राहिले. रुग्णशय्येवर असणारे आमचे बाबा याही परिस्थितीत इथल्या कामाचा आढावा घेत होते. फोटो मागवत होते आणि मी पुढे काय केलं पाहिजे याबाबत सूचना करत होते. अखेर २६ जुलैला अघटित घडलं आणि ते आम्हाला सोडून गेलं. आम्ही शहर पुन्हा उभं केलं. नगराध्यक्ष म्हणून जे जे करता येतंय ते मी केलं. वडिलांच्या दुख:तून सावरण्यासाठी महाडकरांनी प्रेम आणि सहानुभूती दिली. यासाठी मी त्यांचे आभार मानते”, असं म्हणत त्यांनी महाडकरांसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
महाड, पोलादपूर, माणगावच्या जनेतेने सातत्याने शिवसेनेवर प्रेम केलं. तब्बल सहा वेळा या पक्षाचे आमदार निवडून आले. आज या सभेच्या निमित्ताने या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल ही ग्वाही देण्यासाठी मी आणि माझे सहकारी येथे उपस्थित आहेत, असा निश्चयही त्यांनी बोलून दाखवला. या सभेकरता माणगाव, पोलादपूरहून लोकं आले आहेत. आम्ही उद्धवसाहेबांचेच असं ठरवून टाकले. नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. निवडणुकीदरम्यान आश्वासनांपैकी ९० ते ९५ टक्के कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. नगरपालिका फंडातील १५ कोटी खर्च करून नगरपालिकेच्या मालकीची इमारत डौलाने उभी आहे. पाच वर्षांत तीन वेळा नगरपालिकेला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जे जे महाडकरांना अभिप्रेत होतं ते ते करण्याचा प्रयत्न केला. आज, या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहून खऱ्या अर्थाने महाडकरांनी माझ्या कार्याचा गौरव केला.
हेही वाचा >> “…तर महाराष्ट्र पेटवू”, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले, “हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन…”
जे जे टाकाऊ आहे, ते ते काढून टाकायचं आहे. मोठी स्वच्छता मोहीम हाती घ्यायची आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असंही त्या म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या रायगडच्या भूमित झाला आणि स्वराज्याचा वारू चारी दिशांना उधळळा. आजच्या या महाडच्या सभेनंतर आपलीही विजयाची मुहूर्तमेढ रोवली जाईल आणि इथूनच शिवसेनेच्या विजयाचा रथ संपूर्ण महाराष्ट्रात चौफेर उधळेल, यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.