चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अवैध व बनावटी दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुन्हेगारी, बाल गुन्हेगारी, बनावट दारूमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी मागे घेण्यात यावी असे पत्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले असून २ संप्टेंबर रोजी मंत्रालयात गृहमंत्री सोबत बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे.

दारुबंदी असलेल्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध दारू व बनावट दारू विक्री केल्या जात आहे. या अवैध दारु विक्रीमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असताना सुध्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सुध्या पाच वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी लागू झाल्यानंतर या जिल्ह्यात सुध्दा दिवसरात्र अवैध दारू व बनावट दारू विक्री सुरू झाली. या अवैध दारू विक्रीमध्ये तरुण मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समावेश असून या तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होत असून हजारो कुटुंबाचे संसार सुध्दा उध्वस्त होत आहे. तर अनेकांचा बळी सुध्या गेलेला आहे. तसेच दारू माफियाकडून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती.

आणखी वाचा- धान्य खरेदी भ्रष्टाचारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचे आदेश

या दोन्ही जिल्ह्यात फक्त नावाचीच दारूबंदी असून दाम तिपटीने अवैध रित्या दिवसरात्र मोठ्या प्रमाणात खुलेआम दारूची विक्री होत आहे. यामुळे राज्याचा करोडो रुपयाचा महसूल सुध्दा बुडत आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सुरू ठेवावी की उठवावी याबाबत मत मागितले असता 80 टक्के लोकांनी दारू सुरू करावी असे मत व्यक्त केले.या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारू पुन्हा सुरू करावी अशी लेखी पत्रव्दारे राज्य उत्पादन शुल्क मंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली असून यावर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी अशी सुध्या मागणी केली आहे.