देशामध्ये करोनाच्या काळात विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ‘नमामी गंगा’ अशी प्रधानमंत्री मोदींनी २०१४ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु आता मात्र परिस्थिती ‘शवामी गंगे’ अशी झाली आहे. अशा शब्दांमध्ये राज्यातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
खासदरा बाळू धानोरकर म्हणतात, ” जवळपास ४० टक्के लोकांचं जीवनमान अवलंबून असलेली ही पवित्र नदी आहे. जगाच्या नकाशावर सांस्कृतिक व पवित्र नदी असा उल्लेख आहे. आज ७ वर्षाच्या मोठा कालखंड उलटून देखील केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे व नियोजनशून्य कामामुळे नमामी गंगेचे शवामी गंगेत रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे. नदीच्या पात्रात अनेक मृतदेह वाहत येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भारताची मान शरमेनं खाली गेली आहे. हा संपूर्ण भारतीयांचा जगभरात झालेला अपमान आहे.”
याचबरोबर करोनाविरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेण्याचं आवाहनही खासदार बाळू धानोरकर यांनी केल आहे.
बिहारच्या बक्सरनंतर, यूपीच्या गाझीपूरमध्ये नदीत तरंगताना आढळले मृतदेह
तसेच, ”प्रदूषित असलेली गंगा नदी आपण स्वच्छ करू असं सांगत २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामी गंगे असा कार्यक्रम राबविला. तसेच, २०१५ मध्ये भाजपा सरकारने या नदीच्या पंचवार्षिक स्वच्छता योजनेसाठी २० हजार कोटी रुपये देण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र, मोदींच्या वाराणसी मतदारसंघात गंगेच्या तीरावरील एक महत्वाचं यात्रास्थळ आहे. तिथे देखील अशीच विदारक परिस्थिती आहे.”
Fact Check: कोव्हिड मृतांचे आकडे लपविण्यासाठी गंगा नदीत मृतदेह फेकल्याचा दावा
याशिवाय, ”गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झांरी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्युंचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जातोय. उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य बनत चाललं आहे. त्यामुळे जगात देशाचे नाव चुकीच्या पद्धतीने जात आहे. करोनाच्या उपायोजना करण्याकरिता विरोधी पक्षाच्या सूचना देखील विचारात घ्याव्या, करोनाची लढाई ही फक्त भाजपाची नसून सर्वांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे.” अशी विनंती काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.