लॉकडाउनमुळे चिंतेत असणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. १५ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासोबतच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न असणार असल्याची माहितीही यावेळी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, “पेपर अडकून पडले असल्याने यावर्षी आपला निकाल उशीर येतोय. १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरु करता येतील. त्यादृष्टीने आम्ही जास्त मेहनत करत आहोत. लवकरात लवकर करता येईल या यासाठीही प्रयत्न सुरु आहेत”.

शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता
दरम्यान सोमवारी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बैठकीत उपस्थित होत्या. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

असं असेल प्रत्येक वर्गाचं टाइमटेबल
रेड झोनमध्ये नसलेल्या ९ , १० १२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून सुरु होणार आहेत. तर सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरु होतील. तसंच तिसरी ते पाचवीर्यंतचे वर्ग सप्टेंबरपासून तर पहिली आणि दुसरीचे वर्ग व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरु होतील असं सांगण्यात आलं आहे. ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे.

ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितलं आहे.

पहिली, दुसरीसाठी ऑनलाइन नाही
ऑनलाइनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी बैठकीदरम्यान दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown education minister varsha gaikwad on scc hsc results sgy
First published on: 16-06-2020 at 19:02 IST